नक्की साल आठवत नाही. पण बहुधा १९४३ साल असावं वाटतं. कवी प्रभाकर गुप्ते यांचा शंकराच्या जीवनावरील एक ऑपेरा त्यावेळी श्रीधर पार्सेकर बसवत होते. त्या ऑपेरात मी, शांता आपटे, दत्ता डावजेकर, अंभईकर, राम मराठे, सडोलीकर आणि बाबूजी अशी गायक मंडळी होतो. त्यावेळची एक गंमत मला आठवतेय. शांता आपटे फार मिष्किल बोलणारी, थट्टेखोर वृत्तीची होती. त्या ऑपेरात पुरुष मंडळींची भूमिका होती हिमशिखरांची. काव्याचे कागद घेत ही मंडळी स्वतःभोवती गिरक्या घेत ते पाठ करत फिरायची. बाबूजी प्रथमपासूनच मूडी. ते तसे फिरत असताना शांता आपटे मला म्हणाली, “ललिता, इकडे ये, गंमत दाखवते बघ.” मी जवळ गेले तेव्हा बाबुजींकडे बोट दाखवून ती म्हणाली, ” ती बघ हिमशिखरं कशी गोलगोल फिरतायत.” त्यावेळी मी बाबूजींना प्रथम पाहिलं, पण मी त्यांच्याशी बोलले मात्र नाही. कामापुरतं बोलायचं अशीच माझी तेव्हा वृत्ती होती आणि आजही आहे.
त्यांच्यानंतर बाबुजींशी पुन्हा भेट झाली ती त्यांनी मुंबई आकाशवाणीसाठी मदनसंहार या संगीतिकेसाठी गायला बोलावलं तेव्हा! त्या संगीतिकेत मी रतीची आणि वाटवे यांनी मदनाची गाणी म्हटली होती. त्या निमित्तानं माझा त्यांचा परिचय झाला. त्यांच्याकडे मी गेले तेव्हा माझ्या उच्चारणातल्या हिंदी टोनमुळे ते खूप चिडले, रागावत. त्यांच्या कपाळाला आठ्या पडत. आमची खूप वादावादी व्हायची. भांडणं व्हायची. तरीही त्यांना ज्यावेळी संगीत दिग्दर्शक म्हणून कमलाबाई मंगळूरकरांचा रुक्मिणी स्वयंवर हा चित्रपट मिळाला तेव्हा त्यांनी पुन्हा पार्श्र्वगायनासाठी मला बोलावलं.
बाबूजींचा त्याकाळी मराठी चित्रपटात थोडाफार जम बसू लागला होता. मराठी चित्रपटाचं बहुतेक काम त्याकाळी पुण्याला होत असे. त्यामुळे बाबूजींनाही पुण्यातच राहून ती गाणी रेकॉर्ड करावी लागत. एकदा त्यांनी मला जीवाचा सखा नावाच्या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुण्याला बोलावलं. ” पुण्याला अमुक अमुक गाडीनं या. स्टेशनवर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आमची गाडी तयार असेल.” असं त्यांनी आग्रहानं लिहिलं होतं. पण कसलं काय नि कसलं काय. मला एकतर पुण्याच्या गाड्यांची काही माहिती नव्हती आणि त्यादिवशी कामाची आणि रेकॉर्डिंगची गडबडही बरीच होती. त्यामुळे ठराविक गाडी गाठता येणार नाही असं लक्षात येताच मी चक्क घरी निघून आले. तिकडे बाबूजी रेकॉर्डींगपर्यंतची सगळी तयारी करून बसले होते. त्यांनी माझी वाट बघबघ बघितली आणि मग ते असे भडकले की काय विचारू नका. एकंदरीत त्यावेळी त्यांचा माझ्याविषयी काही फार चांगला ग्रह झाला नाही.
१९४९ साली बाबूजींना संत जनाबाई हा चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यात जनाबाईचं काम हंसा वाडकर करत होत्या. ज्यावेळी पार्श्वगायकांचा विषय निघाला तेव्हा जनाबाईंच्या गाण्यासाठी हंसाबाईंनी माझं नाव सुचवलं तेव्हा बाबूजी म्हणाले, “मी तिला बोलावणार नाही. ती फार मिजासखोर बाई आहे.” “असं का म्हणता?” हंसाबाईंनी त्यांना विचारलं. तेव्हा हे म्हणाले की, “मी मागे तिला गाण्यासाठी बोलावलं होतं तेव्हा ती आली नाही. त्यामुळे आता मी तिला बोलावणार नाही.” परंतु हंसाबाईंनी आग्रह धरला. दायित्व स्वतःकडे घेऊन मला बोलावून घेतलं.
मी आणि माझी आई हंसाबाईंच्या सोबतीनं पुण्याला गेलो. प्रभातच्या गेस्ट हाउसमध्ये त्यावेळी आम्ही राहत असू. मी रेकॉर्डिगला गेले की आईला कंटाळा येई. बाबूजींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी आईला आपल्या घरी पाठवण्याचा आग्रह केला. मग आई त्यांच्या घरी जाऊ लागली. त्यावेळी बाबूजींच्या बरोबर त्यांचे बंधू नाना आणि वहिनी राहत असत. वहिनींची आईला छान सोबत होई. नाना, वहिनी आईला आग्रह करून जेवायला, फराळाला ठेवून घेत. एक दिवस नानांनी आईला विचारलं “तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करील काय?” आई म्हणाली, “तुम्ही तिलाच विचारा. ती रागीट आहे. लग्नच करणार नाही म्हणतेय.” मग नानांनी मलाही विचारलं. मी नकार दिला. इतक्या संगीतकारांबरोबर काम करूनही माझ्या व्रतस्थ वृत्तीमुळे मी आपण बरं आणि आपलं काम बरं असं वागत असे. त्यामुळे माझ्या मनात कधीही कुणाबद्दल तसली भावना कधी निर्माणच झाली नव्हती. पण नाना ऐकेनात. ते म्हणाले, “माझा भाऊ तुम्हांला पसंत नाही का?” मी म्हणाले, “तुमचा भाऊ चांगला आहे. पण मला लग्नच करायचं नाही.” ते पुनःपुन्हा विचारू लागल्यावर तो विषय टाळण्यासाठी मी त्यांना माझ्या बहिणीच्या लग्नाचं कारण सांगितलं. तेव्हा नाना म्हणाले, “त्या लग्नाचं काम आमच्याकडे लागलं.” कबूल केल्याप्रमाणे त्यांनी माझ्या बहिणीचं लग्न जमवून दिलं. त्यांना मी, “आमचं मुळीच पटणार नाही, ते रागीट स्वभावाचे आहेत, तर मी स्वतःही रागीट आहे” असंही सांगून बघितलं. मला त्यांनी संगीत दिग्दर्शन करतानाच्या आमच्या वादावादीचं स्मरण होई. वाटे. “आपलं यांच्याशी जमेल का?” पण नाना आणि वहिनींचा मनोमन निश्चय झाला होता.
खरं पाहता तोवरच्या आयुष्यात मी बरेच कष्ट काढले होते. सुरुवातीला पैशाच्या टंचाईमुळे आणि पुढे कामाच्या व्यापात गुंतत गेल्यानं शालेय शिक्षण सारं राहिलंच होतं, पण कुटुंबाचीही जबाबदारी डोक्यावर असल्यानं लग्नाचाही विचार कधी केला नव्हता. खडतर मार्गानं जाऊनही बाबूजींच्या मनाचा सरळपणा, थोडासा भाबडेपणा आणि इतरांच्या वाकडया वागण्यानं त्यांना येणारी चीड ही त्यांची वैशिष्ट्यं माझ्या नजरेत भरली होती. बहिणीच्या लग्नानंतर माझ्या डोक्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही बऱ्याच कमी झाल्या होत्या. कर्जही फिटलं होतं. बरे दिवस आले होते. त्यामुळे मी शेवटी लग्नास होकार दिला.
आमचं लग्न पुण्यात झालं. २९ मे १९४९ रोजी. लग्नाचं सारं दायित्व नानांनी पत्करलं होतं. त्यांनी आणि बाबूजींनी सारा खर्च केला. आमच्या लग्नात पार्श्वगायक म्हणून नंतर अतिशय प्रसिद्ध झालेल्या महंमद रफींनी मंगलाष्टकं म्हटली होती. लग्नापूर्वी मी बाबूजींना अट घातली होती की लग्नानंतर मी माईकपुढे उभी राहणार नाही. हो! गाण्याला मी फार विटले होते. लग्न झाल्यानंतर मला स्वस्थ आणि शांत आयुष्य हवं होतं. माझा हा निर्धार मी शब्दशः नाही तरी बऱ्याच अंशी पाळू शकले खरी!
बाबूजींचा स्वभाव तसा साधा. स्वभावाप्रमाणे राहणीही साधी होती. आपल्या कुटुंबियांविषयी त्यांना आस्था होती. कामाच्या कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी घरच्या जबाबदाऱ्यांकडे त्यांनी कधीही काणाडोळा केला नाही.
बाबूजींच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हणजे ते सांबसदाशिवाचा अवतार होते. कुणालाही दुखावणं त्यांना सहसा पटत नसे. प्रत्येकाला नीट शब्दांत ते समजावून सांगत, प्रोत्साहन देत. त्यामुळे अनेक भिन्न भिन्न प्रकारची माणसं आमच्याकडे येत. ताल, सूर, लय, गळा नसलेली माणसंही आपलं गाणं त्यांना ऐकवण्यासाठी येत. कविताही आणून देत. एकदा तर एका कल्हईवाल्यानंही त्याची कविता आणून दिली आणि वर म्हणाला, “तुम्ही याला चाल लावा म्हणजे तुमचं मोठं नाव होईल” एकानं एक कथा आणून दिली आणि म्हणाला, “यावर चित्रपट काढा. तुम्हाला कीर्ती, पैसा मिळेल.” “प्रोड्युसर” होण्याच्या स्वप्नापायी अशाच एका मित्राला दिलेल्या शब्दाप्रीत्यर्थ त्यांनी बरचसं कर्ज डोक्यावर घेतलं. त्यांचा स्वभाव सच्चा आणि मानी होता. त्या कर्जातून मुक्त होताना आमचे फार हाल झाले. कधीकधी श्रीधरच्या औषधालाही पैसे नसत. धान्याला पैसे नसत. नाना म्हणत, “वहिनी, तुम्ही लग्नापूर्वी गाणी गाऊन पैसे मिळवत होता. आज तुम्ही स्वस्थ का?” बाबूजी म्हणत, ‘”निर्माता जर मला सांगत नाही की तुझ्या बायकोकडून गाणी गाऊन घे, तर मी कशी ती गाऊन घेणार?” त्यांचा स्वाभिमान त्यांनी कधी मोडू दिला नाही. त्यांनी खूप हाल काढले. लहानपणी एक कप चहासाठी ते व्ही.टी. वरून दादरला येत. तेव्हा त्यांची भावना अशी की, घरी येणाऱ्या माणसाला विन्मुख कसं पाठवायचं! यावरून मी कधी काही बोलले की ते म्हणत, “या परिस्थितीतून मी गेलेलो आहे. यातना मला समजतात.” पण बाबूजींच्या अशा स्वभावामुळे आमच्याकडे कोणीही धर्मशाळा असल्यासारखे येत. कधीकधी तर एखाद्याची अडचण समजून त्याला मदत केली तर पुढच्या वेळी तो माणूस हक्क असल्याप्रमाणे हप्तावसुली करायला आल्यासारखा येई. मला या गोष्टींचा राग येई. बाबूचींची वृत्ती सर्वसंग्राहक, उदार असल्यानं त्याचा लोक गैरफायदा घेत, त्यांना फसवत. मग मी चिडत असे. मग ते कपाळाला हात लावून म्हणत, “कोण मला किती फसवतंय ते मला पाहायचंय! माझा पैसा प्रामाणिक कष्टांचा, निढळाच्या घामाचा आहे. कुणी माझी कष्टाची कमाई अशी लुटून नेऊ शकणार नाही.”
बाबूजींच्याबरोबरील सहजीवनात परीक्षा बघणारे अनेक प्रसंग आले तरी सार्थकतेचे, समाधानाचेही अनेक प्रसंग आले. त्या सर्वांत संस्मरणीय प्रसंग म्हणजे बाबूजींच्या अथक प्रयत्नांनी मोहन रानड्यांची झालेली सुटका. मोहनची सुटका व्हावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांचा खूप स्नेह होता. आपण त्याच्या सुटकेसाठी काही करू शकत नाही याची त्यांना फार खंत वाटे. प्रयत्न केला तेव्हा मोठमोठ्या माणसांनी त्यांना ‘हा नाद सोडून द्या’ असं सांगितलं. पण त्यांनी धीर सोडला नाही, प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी २६ जानेवारीला पहाटे फोन खणखणला. त्यांना गाढ झोप लागली होती. उठवणं बरं वाटत नव्हतं. नानांनी फोन घेतला आणि सांगितलं, ‘मोहन रानडे सुटले.’ नंतर बाबूजी उठल्यावर आम्ही त्यांना ती बातमी सांगितली. ती ऐकून त्यांचा फुललेला चेहरा मला अजूनही आठवतो. त्यांनी लगेच मोहनच्या आईला फोन करून ती बातमी सांगितली. ‘मोहनची सुटका’ हा कौटुंबीक धन्यतेचा क्षण होता असं मला वाटतं.
अशीच संस्मरणीय आठवण दादरा-नगरहवेली मुक्तिसंग्रामात त्यांनी घेतलेल्या सहभागाची आहे. आमच्या घरी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत. अशीच एकदा काही माणसं आमच्या घरी येऊन काही दिवस राहिली होती. त्यांनी त्यांच्या सामानाच्या पिशव्या भिंतीला टेकवून ठेवल्या होत्या. एक दिवस लहानगा श्रीधर मला म्हणाला, “आई त्या काकांनी ठेवलेल्या पिशवीत पिस्तूल आहे.” ते ऐकून मी त्याला काकांच्या सामानाला तू कशाला हात लावलास म्हणून ओरडले. त्यावर तो म्हणाला, “मी नाही हात लावला. काकाच पिशवीतून पुस्तक काढत असताना ते पिस्तूल बाहेर पडलं तेव्हा मी बघितलं.” ते सर्व ऐकून मला आश्चर्य वाटलं. गांधीवधानंतरच्या काळात फडके कुटुंबाचं फार नुकसान झालं होतं. त्यामुळे आता ही काय भानगड म्हणून मी अस्वस्थ झाले. हे घरी आल्यावर त्यांना विचारलं की, “या पिशव्यांमध्ये काय सामान आहे?” ह्यांनी प्रथम काही थांगपत्ता लागू दिला नाही. जेव्हा मी पिस्तुलाबद्दल सांगितलं, तेव्हा हे म्हणाले, “आम्ही नगरहवेलीवर हल्ला करणार आहोत.” त्यांनी अशी कबुली देऊन मलाही त्यांच्यात सामील करून घेतलं. नंतर ते आमच्याकडे वारंवार येणाऱ्या अप्पा करंबेळकरांशी माझ्यासमोर मोकळेपणानं चर्चा करू लागले.
बाबूजींची अशी देशाविषयी आणि समाजाविषयीची बांधिलकी प्रखर होती. नागालँडसारख्या दुर्लक्षित भूमितील लोकांनाही समाजात घेतलं सामावून पाहिजे ही त्यांची भूमिका होती. ते नुसतेच बोलून थांबत नसत, तर कृती करत. एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पद्मनाभ आचार्य आमच्याकडे एका मुलाला घेऊन आले. मुलगा लहान होता पण गोड होता. मला तो आवडला. तो अरुणाचल प्रदेशात राहणारा होता. त्याचं नाव होतं लेकी फुन्चो. त्याला बाबूजींनी आमच्या घरी ठेवून घेतला आणि त्याची सर्व जबाबदारी उचलली. त्याचं मूळचं नाव बदलून आम्ही त्याचं ‘दीपक’ असं नामकरण केलं. श्रीधरसारखंच दीपकलाही आम्ही चांगले संस्कार देऊन आणि चांगले शिक्षण देऊन वाढवलं. आमच्यासाठी तो आमचा दुसरा मुलगाच आहे.
बाबूजी राष्ट्रीय सेवा संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार आणि यांचे मामा डॉ. भालचंद्र पटवर्धन ही बाबूजींची तीन दैवतंच होती. मला सावरकर हे नांव ऐकून माहीत होतं. वडिलांचा स्वभाव कडक होता. परिस्थितीमुळे वर्तमानपत्र वगैरे गोष्टीत लहानपणी रस घेता येत नसे. डॉ. हेडगेवार, संघ ही नावे तर मी यांच्या घरी आल्यावर ऐकली. लहानपणी हे एकदा फार आजारी होते. तेव्हा बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा त्यांना समजलं की आपलं डोकं डॉ. हेडगेवार यांच्या मांडीवर आहे. त्यांच्या अनेक आठवणी बाबूजी नेहमी सांगत. सावरकरांच्या घरी तर त्यांना केव्हाही प्रवेश असे. सावरकर गेले तेव्हा ते ओक्साबोक्सी रडले होते. बाबूजींच्या या तिन्ही दैवतांनी, बाबूजींना वेळोवेळी प्रोत्साहन देऊन, त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला होता. त्यांनी दिलेल्या संस्कारांवर बाबूजींचा पिंड घडला होता. त्यामुळे बाबूजी कलाकारापेक्षा जास्त देशभक्त आणि समाजसेवक होते, असं मला वाटतं.
अण्णा
औरंगाबाद हे माझं माहेर. मुंबईपासून तसं दूरचं.
ख्यातनाम गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या एकुलत्या एका मुलाशी – श्रीधरशी- माझं लग्न ठरलं, तेव्हा मनाशी आनंद होता, उत्सुकता होती; तसं दडपणही होतंच. सुधीर फडके या नावाचं वलय केवढं मोठं!! इतक्या प्रसिध्द घरात, कुटुंबात माझ्यासारखी एका छोट्या शहरातली मुलगी कशी रुळणार?- अशी हुरहुर मनात घेऊनच मी फडक्यांच्या घराचं माप ओलांडलं होतं. – पण अण्णांनी आल्या क्षणापासून माझ्या मनावरचं दडपण त्यांच्या प्रेमाने, मायेने पुसून टाकायला घेतलं. अण्णांचा साधेपणा अंगभूत असावा इतका नैसर्गिक होता आणि स्वभावातली मायाही. त्यांनी हलकेहलके करत मला कुटुंबात रुळायला मदत केली. टोकाची शिस्त, प्रामाणिकपणा, कठोर वाटावी अशी मूल्यनिष्ठा आणि त्याचवेळी अतीव साधेपणा म्हणजे अण्णा! अविरत कष्ट करण्याची त्यांची तडफ, जे करतील त्यात जीव ओतण्याची त्यांची तळमळ हे सगळंच मोठं मोहून टाकणारं होतं. ते जसे आहेत, तसं आपण असायला/व्हायला हवं असं त्यांच्या सहवासात येणा-याला आपसूक वाटत असे. मीही अर्थातच अपवाद नव्हते. आपल्या स्वभावा-विचारांशी, कामांशी आणि ध्येयांशी जुळणारी मतं असलेल्या माणसांना खुबीने एकत्र करून त्यांना आपल्या हातातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेण्याची अण्णांची क्षमता अद्वितीय अशीच होती. माणसं जोडत जाणं, त्यांना आपलेपणाने बांधून ठेवणं, त्या स्नेहाला खतपाणी घालत राहणं, हे सारं अण्णा अत्यंत मन:पूर्वक निगुतीने करत असत.
संगीतकार म्हणून एकेका सुराच्या अचूक नेमकेपणासाठी ते किती कठोर होत असत, त्यासाठी किती आटापिटा करीत याविषयी अनेक गायक-गायिकांनी आपले अनुभव वेळोवेळी सांगीतलेले आहेत. – पण समोरच्याकडून ‘परफेक्शन’ची अपेक्षा धरणारे अण्णा स्वत:ला किती कठीण परीक्षेला बसवीत, हे मोजक्याच माणसांना ठाऊक असेल. आणि हे फक्त संगीतसाधनेत नव्हे, अगदी घरातल्या साध्यासाध्या गोष्टींमध्येही चाले. रोज रात्री झोपण्यापूर्वी गादीवर पलंगपोस घालावा, तर तो अण्णांनीच! अगदी मन लावून अशी चादर घालीत, की एक सुरकुतीही दिसू नये. त्यांना भांडी घासण्याची, घरातला केर काढण्याचीही फार आवड. एखादं भांडं घासतील, तर ते त्यात अगदी चेहेरा दिसावा असं चकचकीत! केर काढतील, तर जमिनीवर धुळीचा एक कणही दिसू नये इतक्या निगुतीने. एवढा मोठा कलाकार, पण घरातली ही रोजची कामं करण्यात अण्णांनी ना कधी कमीपणा मानला, ना कधी कसला बडेजाव केला. श्रम ही त्यांच्यासाठी साधना होती. कोणत्याही कामात ते कमीपणा मानत नसत. अण्णा स्वभावाने तसे तापट. पण मनाने अत्यंत हळवे होते. जवळच्यांवर जीव जडवून त्यांची काळजी घेण्याची अलवार कला शिकावी तर ती अण्णांकडून असं त्यांचं वागणं मी अनेक प्रसंगात अनुभवलं आहे. कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकलाकार आणि स्नेह्यांबरोबरच त्यांच्यासाठी काम करणा-या सहका-याच्या सुखदु:खात अण्णांची सोबत कायम असे.
अण्णांचं आयुष्य ही एक अडथळ्यांची शर्यतच होती. लहान वयात खूप सोसलेलं. मोठेपणी प्रसिध्दी, मानसन्मानाबरोबर अडथळे आणि संकटंही नशिबी आली. पण अण्णांनी कधी संकटांना, अडचणींना पाठ दाखवली, कधी हतबल झाले, असं मला दिसलं नाही. उलट अडचण आली, प्रश्न उभे राहीले, की अण्णा अधिकच चिवट होऊन दोन हात करण्यासाठी सज्ज होताना मी पाहीले आहेत.
वीर सावरकरांवर चित्रपट निर्मितीचं अण्णांचं स्वप्न पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर तर इतके अडथळे आले, की एखाद्याने हात टेकले असते. त्यात अण्णांचं हृदयविकाराचं दुखणं उभं राहीलं. त्यात खूप काळ गेला. पण हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांनी सावरकर प्रतिष्ठानच्या कामाचा वेग कधी मंदावू दिला नाही. एकीकडे उपचार चालू.. आणि अण्णा मात्र वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीत गळ्यापर्यंत बुडालेले! निधी संकलनापासून प्री-प्रॉडक्शनपर्यंतची अक्षरश: असंख्य कामांची निर्गत अण्णांनी हॉस्पिटलमधूनच लावली. आणि प्रकृतीला आराम पडल्यावर वेगाने चित्रपट पूर्णत्वाला नेला. अण्णांचं नाव मोठं. आणि त्यांच्याभोवतीचं वलयही. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने समाजातल्या कितीतरी मान्यवरांशी, शासन संस्थांशी त्यांचा जवळचा स्नेह होता. पण या ‘ओळखी’चा फायदा आपल्या व्यक्तिगत लाभासाठी करून घेण्याचा मोह अण्णांना चुकूनही कधी पडला नाही. त्यांना मोह होता तो अत्युच्च दर्जाच्या कलानिर्मितीचा! इतर भौतिक मोहांमध्ये त्यांचं मन कधीही गुंतून पडलं नाही.
इतका मानसन्मान, वैभव मिळालं; पण अण्णा त्यांच्या साध्यासुध्या मध्यमवर्गीय मराठी आयुष्यात खुष असत. आधुनिक सुखसोयींनाही त्यांच्या आयुष्यात प्राधान्य नव्हतं. इतकं, की अगदी फारच गरज असेल; तेव्हाच ते टॅक्सीने जात. – एरवी बेस्टची बस!! भरलेल्या बसमधून उघड्या खिडकीतला वारा खात प्रवास हीच अण्णांसाठी चैन असे..
मी अगदी लहान होतो तेव्हाची गोष्ट. आम्ही सर्वजण कुठेतरी प्रवासाला निघालो होतो. तिसऱ्या वर्गाचं रिझर्व्हेशन होतं. गाडीला चिक्कार गर्दी. आमच्या रिझर्व्ह डब्यातही काही लोक घुसले. अण्णा वैतागले. त्यांच्याशी भांडले. जागा मिळवली. नंतर त्या लोकांनाही जागा मिळाली. थोड्या वेळानं आईनं खाण्याचे पदार्थ बाहेर काढले. अण्णांनी ते सगळ्यांना दिले. थोड्या वेळापूर्वी ते ज्यांच्याशी ते भांडले होते, त्यांनाही अगदी आग्रहानं, “घ्या हो! आगोदरचं विसरून जाऊ या सगळं” हसत हसत ते त्यांना सांगत होते.
माझ्यावर लहानपणी संस्कार झाले ते अशा लहान लहान प्रसंगातूनच. अण्णा जेवढे शिस्तप्रिय तेवढेच प्रेमळ. टापटीप आणि स्वछता यांचे भोक्ते होते. पलंगावरच्या चादरीला सुरकुती पडलेली त्यांना आवडत नसे. पलंगावर बसून उठले, झोपून उठले की स्वतःच सगळं करत. इतरांना काहीच करू देत नसत. लहानपणापासून मी हे सगळं पाहत आलो. कळत-नकळत ते पचनी पडत गेलं. त्या-त्या सवयी लागत गेल्या. आज मला त्या सगळ्यांचा उपयोग होतोय. लहानपणी अण्णा वेळ असेल तेव्हा शाळेत सोडायला यायचे. इतरांच्या वडिलांसारखेच मस्ती केली तर ओरडायचे. त्यांना मी घाबरायचो. तितकीशी जाणही नव्हती. जसजसा मोठा होत गेलो तसतसं अण्णा किती मोठे आहेत, हे कळायला लागलं. छाती गर्वानं फुगायला लागली.
मुळात अण्णांना इंजिनियर व्हायचं होतं पण परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही. त्यांचं हे स्वप्न मी पूर्ण करावं, मी भरपूर शिकावं असं त्यांना वाटायचं. अर्थात त्यांनी माझ्यावर कोणतीही गोष्ट कधीच लादली नाही. तुला हवं ते कर, फक्त जे काही करशील ते विचार करून कर, असं त्यांचं म्हणणं असायचं. पण मी संगीतक्षेत्रात शिरेन, याची मुळात मलाच कल्पना नव्हती. मी काहीतरी लुडबुड करायचो, पण ‘संगीत देऊ शकतो’ असं अण्णांना सांगायची मात्र मला थोडी भीती वाटायची. एकदा सहज गुणगुणत बसलो असताना अण्णांनी पडद्याआडून ते ऐकलं. माझं कौतुक केलं.
फक्त वडील म्हणून नाही, माणूस म्हणूनही अण्णा खूप मोठे होते. अगदी प्रवाहाविरुद्ध जाऊनही त्यांनी अनेकांना मदत केली होती. १९६७ च्या डिसेंबर महिन्यात कोयनेचा भूकंप झाला. प्रचंड हानी झाली. ताबडतोब भरपूर आर्थिक मदतीची आवश्यकता होती. अण्णांना तेव्हा खरं तर फेशियल पॅरॅलिसिसचा अटॅक आला होता. पण तरीही त्यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले, स्वतःला त्रास होतोय याची पर्वा न करता. अण्णांचा स्वभावच होता तो. एकतर ते अतिशय कष्टाळू होते. एकदा एखादं काम हाती घेतलं, की ते पूर्ण करायचंच, तेही नेमकेपणानं असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या गाण्यात जसा नेमकेपणा असतो तसाच इतर प्रत्येक गोष्टीत!
आमची दादरची जागा तशी लहान, इन-मीन-तीन खोल्यांची. अण्णांनी या जागेची रचना पाच-सहा वेळा तरी बदलली असेल. स्वतःच्या कल्पनेनं ते नवीन इंटिरिअर बनवून घ्यायचे. प्रत्येक रचना इतकी वेगळी की तीन-चार वर्षांनी एकदा माणूस घरी आला, तर त्याला ‘आपण घर चुकलो तर नाही ना?’ अशी शंका यावी. अण्णांच्या संगीताच्या बाबतीतही असंच नाही का होतं? त्यांच्या गीतरामायणाचं उदाहरण घेऊ या. प्रत्येक गाण्याची चाल वेगवेगळी. त्यांचं संगीतातलं ज्ञान, वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा त्यांनी केलेला अभ्यास आणि मुख्य म्हणजे त्यांची कल्पक बुद्धिमत्ता या सगळ्यातून हे संगीत जन्माला आलंय आणि म्हणूनच ते परिपूर्ण आहे. गाण्याची सुबक गोड चाल आणि शब्दाप्रमाणे त्यांच्या स्वरातल्या भावना यामुळे त्यांचं गाणं लोकांना भावलं. ‘सूड घे त्याचा लंकापती’ हे गीतरामायणातील शूर्पणखेचं गाणं. नाक-कान कापलेली शूर्पणखा अपमानित होऊन, चिडून रावणाकडे जाते, तो प्रसंग. पहिल्या काही ओळींत तिचं कडाडणं आहे. अण्णांनी दिलेली चालही अशीच, कडाडल्यासारखी. पण नंतरच्या कडव्यात शूर्पणखा रामाचं वर्णन करते – ‘तो रूपानें रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर, त्याच्यासंगे जनक कन्यका रतीहुनि सुंदर’ इथे अण्णांच्या चालीला आपोआप हळुवारपणा येतो. ते कडवं संपलं की पुन्हा शूर्पणखेचं कडाडणं सुरु होतं. पण ही बदललेली चाल कुठेही वेगळी पडत नाही. पहिलीतून दुसरी आणि दुसरीतून पुन्हा पहिली येते. अण्णांचं वैशिष्ट्य आणि यशही नेमकं इथेच होते.
ते स्वतः गातांना, गाण्याच्या शब्दांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही बदलत असत. त्यांना गातांना पाहणं हा एक वेगळा अनुभव होता आणि मी तो अनेक वेळा घेतलाय. त्याचे हावभाव, हाताची फेक नैसर्गिकरित्या होते. “चित्रपटातील गाणं हे एक नाटकच असतं. शब्दाशब्दातून इथे प्रसंग जिवंत करायचा असतो” असं अण्णा म्हणत. म्हणूनच भावनेला ते खूप महत्व देत. ‘थकले रे नंदलाला’ या गाण्यातला ‘थकेल’ हा शब्द थकल्यासारखाच म्हणायला हवा, असा त्यांचा आग्रह असे. आशाबाई त्यांची ही जागा सहीसही उचलतात. ‘हा माझा मार्ग एकला’ हे गाणं ऐकतानाही त्यातला प्रसंग, त्या माणसाची अवस्थाच डोळ्यांसमोर उभी राहते. अण्णांचं हे देखील एक वैशिष्ट्यच होतं की ते गाण्यातून अभिनय करत असत. भावभावनांच्या अशा दर्शनामुळे त्यांचे गाणं प्रभावी होत असे.
मुलगा आणि संगीतकार म्हणून मला त्यांचा अचंबा वाटतो. त्यांच्या चाली प्रथम खूप सोप्या वाटतात. पण आपण म्हणायला गेल्यावर कळतं की त्या किती गहन आहेत. त्यांनी बहुतांश चित्रपटातूनच गाणी केली. तीही सुगम संगीत-भावगीत अशी. पण त्यांच्या गाण्यातले शब्दोच्चार आणि भावना यांचं मला विलक्षण आकर्षण वाटतं. हे असं कसं जमू शकतं? यांचं मला आश्चर्य वाटतं. त्यांची विचारशक्ती अतिप्रचंड होती. त्यामुळेच ते एकाचवेळी संगीताच्या अनेक पातळ्यांवर विचार करू शकत होते आणि त्यामुळेच त्यांच्या गाण्यात ती अचूकता असे. त्यांचं गाणं अतिशय सुगम असे. ऐकायला खूप गोड. त्यांचा तसा अट्टाहासच असे. त्यांचं कुठलाही गाणं ऐकलं की पटकन जाणवणारं वैशिष्टय म्हणजे त्या गीतांचा आकर्षक मुखडा. गाण्याचा मुखडा ते अतिशय सुबकरित्या बांधत. मला ते नेहमी सांगत गाण्याच्या सुरुवातीला उगीचच काहीतरी फाफटपसारा असता काम नये. कुणीही ऐकल्यानंतर त्यांचं ध्यान आकर्षून घेण्याची शक्ती त्यात असली पाहिजे. त्याचप्रमाणे मुखड्यावरून अंतऱ्यावर जाणं आणि अंतरा संपून पुन्हा मुखड्यावर येताना त्यांनी केलेली संगीतरचना अगदी तर्कशास्त्रला धरून असायची. म्हणजे अंतऱ्यावरून मुखड्यावर जाताना हा सूर येथे जमत नाही तेव्हा एखादा संगीताचा तुकडा टाकून वेळ मारून न्यावी असं त्यांचं धोरण नसे. संगीतरचनेच्या बांधणीत सुसूत्रता असे. सुवासिनी चित्रपटातील ‘जिवलगा कधी रे येशील तू’ हे गीत चार रागांवर आधारित आहे. प्रत्येक रागातून मूळ रागात येणं अत्यंत कठीण होतं. पण अण्णांनी ते इतकं सहज बांधलंय की प्रत्येक अंतऱ्यानंतर एक तान टाकून ते बरोबर यमनवर परत आलेत. त्यांची ती कलाकुसर थक्क करणारी आहे. अर्थात, अण्णांचा शास्त्रीय संगीताचा पाया अतिशय भक्कम असल्यानं ते हे सहजगत्या करू शकले.
अण्णांचा संगीताचा अभ्यासही दांडगा होता. सुरवातीच्या काळात कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पुष्कळ भ्रमंती केली होती. विशेषतः उत्तर प्रदेशात त्यांनी अनेक कार्यक्रमही केले होते. ते कलकत्यातही काही दिवस होते आणि नंतर एचएमव्ही कंपनीतही ते काही काळ नोकरीला होते. या सर्व ठिकाणी त्यांनी प्रचंड प्रमाणात तेथील प्रांतीय संगीत ऐकलं. मुळातच अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. अनेक प्रांतीय संगीतातील, लोकसंगीतातील अनेक गोष्टी त्यांनी मराठीत आणल्या पण त्यात मराठीपणा राखूनच. पण त्यामुळे त्यांची संगीतात वैविध्य आलं. उदाहरणच सांगायचं म्हणजे त्यांनी आराम हराम आहे या चित्रपटातील ‘अहो हो साजणा, दूर व्हा, दूर व्हा ना, जाऊ द्या’ या बैठकीच्या लावणीत उत्तर भारतातील हीर या संगीत प्रकारच्या खुबीनं वापर केला आहे. त्यांनी गदिमांना ते सांगून दोघांनी बसून ते गाणं केलेलं आहे. त्यांची बहुतेक गाणी अशी समोरासमोर बसून तयार केलेली आहेत. त्यामुळे गीत आणि संगीत यांचा अगदी योग्य तोल राखलेला आपल्याला बाबूजींच्या संगीतात ठायी ठायी जाणवतो.
लक्ष्मीची पाऊले हा मी संगीत दिग्दर्शित केलेला चित्रपट. या चित्रपटासाठी रेकॉर्ड करत असलेलं पहिलं गीत, ‘फिटे अंधाराचे जाळे’ हे गीत अण्णांनी गावं अशी माझी खुप इच्छा होती. मी त्यांना थोडं घाबरतच विचारलं. ते चटकन तयार झाले. रेकॉर्डिंगच्या वेळी मला खूप दडपण आलं. गाणारे आण्णा आणि आशाताई. एक श्रेष्ठ संगीत दिग्दर्शक-गायक आणि एक श्रेष्ठ गायिका. दोघेही माझ्यासमोर बसले होते. “तू मला गाणं शिकावं. तू शिकवशील तसं मी गाईन” अण्णांनी मला सांगितलं. ते माझ्यासमोर बसले. मला धीर दिला. आपणही एक प्रथितयश संगीत दिग्दर्शक आहोत, हे त्यांनी कुठंही जाणवू दिलं नाही. माझ्या मनावरचं दडपण पुष्कळ कमी झालं.
एकदा पंडित भीमसेन जोशी गीतरामायणाच्या कार्यक्रमाला आले आणि अण्णांना म्हणाले की, “गीतरामायणातील शेवटचं गीत ऐकायला खास आलोय!” हे शेवटचं गीत ‘गा बाळांना श्रीरामायण’ हे भैरवी आहे आणि अण्णांनी हे भैरवी इतकी सुंदर आळवून गायली की, पंडितजी दंग झाले.
गीतरामायण हा तर अण्णांच्या संगीत क्षेत्रातील कार्याचा शिरपेच. महाराष्ट्राला तर गीतरामायणानं वेड लावलं आहेच, पण हिंदी-बंगाली-गुजराती-आसामी-तेलगू-कानडी भाषांतूनही गीतरामायण गायलं जातंय आणि विशेष म्हणजे सर्वत्र अण्णांच्याच चालीत गायलं जातंय.
एक मुलगा म्हणाला मला त्यांचा निश्चितच अभिमान वाटतो. संगीतक्षेत्रात माझ्या वडिलांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलंय. त्यांनी संगीताच्या क्षेत्रात एक ‘सुधीर फडके स्कूल’ म्हणजे घराणंच म्हणावं अशी स्वतंत्र वाट तयार केलीय.